Sunday, September 29, 2024 12:32:16 AM

Appeal of Jayant Mainkar
राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणे हा पत्रकारांचा हक्क - जयंत माईणकर

पत्रकारांनी  कुठल्याही हुकूमशाही, दमनशाही विरुद्ध लढा द्यावा असेही आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी केले.

राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणे हा पत्रकारांचा हक्क - जयंत माईणकर
Jayant Mainkar

 

सासवड : राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणे हा पत्रकारांचा हक्क असल्याचा उल्लेख करत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे न देणारे राज्यकर्ते आज राज्य करत आहेत, याबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी खेद व्यक्त केला आणि पत्रकारांनी  कुठल्याही हुकूमशाही, दमनशाही विरुद्ध लढा द्यावा असेही त्यांनी आवाहन केले.

आचार्य अत्रे यांच्या ५५ व्यां स्मृती दिनानिमित्त आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. आचार्य अत्रे पुरस्कार हा महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी नोबेल पुरस्कार असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. आचार्य अत्रे यांच्या मानसकन्या साबळे होत्या त्यामुळे अत्रे यांच्या बरोबरच शाहीर साबळे यांचा नातू म्हणून मला अभिमान आहे. अत्रे यांच्या नावाचा कलावंत पुरस्कार मला मिळाल्याने माझी जबाबदारी वाढली आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले आहे. पुणे येथील आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड बाबुराव कांनडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास भारती सहकारी बँकेचे चेअरमन भाऊसाहेब कड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ अशा स्वरूपात यावेळी आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार जयंत माईणकर, आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ संगीता बर्वे, आचार्य अत्रे कलाकार पुरस्कार केदार शिंदे यांना प्रदान करण्यात आला.

सुवर्णा होले व प्रांजली बर्वे यांच्या सुरेल गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी प्रास्तविकात आजपर्यंतच्या पुरस्कारांचा आढावा घेतला. आचार्य अत्रे यांची पाच प्रमुख गाजलेल्या नाटकांचे प्रयोग पुढील काही दिवसांत पुण्यात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात डॉ सुभाष तळेकर यांनी हिंदीत अनुवादित केलेल्या पिऊ की डायरीया पुस्तकाचे व ज्योतिषाचार्य चारुशीला कांबळे यांच्या अंकशास्त्र आणि मोबाईल न्युमरॉलॉजी व विश्वआकर्षण (लॉ ऑफ ॲट्रॅक्शन) या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. साहित्य परिषद सासवड शाखेचे कार्यवाह सतीश पाटील, जेष्ठ पत्रकार हेमंत ताकवले व सिनेकला दिग्दर्शक संदिप इनामके यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा परिचय करून दिला. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा डॉ संगीता बर्वे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. बाबुराव कांनडे, भाऊसाहेब कड, जयंत माईणकर, सुभाष तळेकर, चारुशीला कांबळे यांनी मनोगते मांडली. शांताराम पोमण, तानाजी कोलते, बंडूकाका जगताप, कलाताई फडतरे, ॲड दिलीप निरगुडे, वसंत ताकवले, कुंडलिक मेमाणे, डॉ राजेश दळवी, बबुसाहेब माहूरकर, शिवाजी घोगरे, प्रा किशोरी ताकवले, श्रीकांत देशपांडे, संजय चव्हाण, शाम महाजन, श्रीकांत कांबळे, किरण हैंद्रे, ॲड अशपाक बागवान, संदिप टिळेकर, शेवंता चव्हाण, हनुमंत जगनगडा, मनोज मांढरे, शशिकला कोलते, डॉ बेबी घोगरे यांसह अनेक साहित्यप्रेमी या प्रसंगी उपस्थित होते. साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड आण्णासाहेब खाडे यांनी आभार मानले तर योगेश सुपेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.


सम्बन्धित सामग्री