मुंबई : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या कामावर बदलापूरच्या घटनेचे परिणाम दिसून आले. बदलापूरच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल यांची गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव या पदावर बदली झाली.
आरोपीला अटक केल्यानंतर पुढील तपासाकरिता पोलीस महानिरीक्षक आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. सुनावणी जलद न्यायालयात घेण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून प्रस्ताव मागण्यात आला. न्यायालयीन सुनावणीसाठी महाराष्ट्र शासनाने उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा तोंडी आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकम यांना कळवला आहे. लवकरच लेखी स्वरुपात निकम यांना आदेशपत्र पाठवले जाणार आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसेच शाळांना विद्यार्थ्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. मुलामुलींना स्पर्शांचे अर्थ समजावून सांगण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने मार्गदर्शन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.