चेन्नई : भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या कसोटीत दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजवला. एका दिवसात १७ फलंदाज बाद झाले.
भारताचा पहिला डाव ३७६ धावांत आटोपला. यानंतर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १४९ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात भारताने ३ बाद ८१ धावा केल्या आहेत. रिषभ पंत १२ धावांवर आणि शुभमन गिल ३३ धावांवर खेळत आहे.
बुमराहने घेतले ४०१ बळी
बांगलादेश विरुद्धच्या चेन्नई कसोटीत खेळताना भारताच्या जसप्रीत बुमराहने ४०० आंतरराष्ट्रीय बळींचा टप्पा पार केला. ही कामगिरी करणारा तो सहावा भारतीय गोलंदाज आहे.
बुमराह हा एकदिवसीय सामन्यांमध्ये शंभर बळी घेणारा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज आणि T20I मध्ये सर्वात जलद पन्नास बळी घेणारा भारतीय गोलंदाज आहे.
- कपिल देव - ६८७ आंतरराष्ट्रीय बळी
- झहीर खान - ५९७ आंतरराष्ट्रीय बळी
- जवागल श्रीनाथ - ५५१ आंतरराष्ट्रीय बळी
- मोहम्मद शमी - ४४८ आंतरराष्ट्रीय बळी
- इशांत शर्मा - ४३४ आंतरराष्ट्रीय बळी
- जसप्रीत बुमराह* - ४०१ आंतरराष्ट्रीय बळी (*खेळत आहे)
रोहित शर्मा आणि विराट कोहली दोन्ही डावात अपयशी
चेन्नई कसोटीत कर्णधार रोहित शर्मा आणि भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली हे दोघे दोन्ही डावात अपयशी झाले. रोहितने पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात पाच धावा केल्या. विराट कोहलीने पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात सतरा धावा केल्या.
रोहित शर्माचा विक्रम
रोहित शर्माने चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात पाच अशा एकूण अकरा धावा केल्या.या ११ धावा करत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडच्या विक्रमाची बरोबरी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०२४ या वर्षात रोहित शर्माने कर्णधार म्हणून एक हजार धावा केल्या आहेत. भारतीय कर्णधार म्हणून त्याने अशी कामगिरी दुसऱ्यांदा केली आहे. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी कर्णधार असताना अशी कामगिरी केली आहे.महेंद्रसिंह धोनी या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने सात कॅलेंडर वर्षात हजार किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. सौरव गांगुलीने पाच वेळा, मोहम्मद अझरुद्दीनने चार वेळा, विराट कोहलीने चार वेळा, सचिन तेंडुलकरने दोन वेळा, राहुल द्रविडने दोन वेळा ही कामगिरी केली आहे.
विराट कोहलीचा विक्रम
विराट कोहलीने चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात १७ अशा एकूण २३ धावा केल्या. या २३ धावा करत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात केल्या बारा हजार धावा केल्या. सचिनने ही कामगिरी २६७ डावात केली तर विराट कोहलीने हा विक्रम २४३ डावात केला.
- भारत विरुद्ध बांगलादेश, चेन्नई कसोटी
- दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला
- भारत ३०८ धावांनी आघाडीवर
- भारत पहिल्या डावात सर्वबाद ३७६ धावा
- बांगलादेश पहिल्या डावात १४९ धावा
- भारत दुसऱ्या डावात ३ बाद ८१ धावा