अकोला : उष्माघाताचा धोका ओळखून प्रशासनाने राज्यातील अकोला आणि जळगाव या दोन जिल्ह्यांमध्ये कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू केली आहे. ही जमावबंदी ३१ मे २०२४ पर्यंत लागू असेल. उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. उष्माघातामुळे सामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी कामगारांना सेवा पुरवणे, खासगी क्लासेसच्या वेळेत बदल करणे आणि अन्य उपाय योजना प्रभावीपणे राबवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले.
अंगमेहनत करणारे कामगार आणि औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही. कामाच्या ठिकाणी उष्माघातापासून संरक्षासाठी शेड तयार करणे, पंखे, कूलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था, पिण्याचे पुरेसे पाणी आणि प्रथमोपचार पेटी ठेवणे, याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकाची राहणार आहे.
याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित ग्राम पंचायत महानगरपालिका, नगर परिषद, पोलीस प्रशासन, कामगार कल्याण विभागाकडे तक्रार करता येईल. खासगी शिकवणी वर्गाच्या संचालकांनी सकाळी १० वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ५ नंतर वर्ग चालवावेत. सकाळी १० ते ५ वेळेत क्लास सुरु ठेवायचे असल्यास तेथे पंखे, कूलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था करण्याची जाबबदारी संबंधित शिकवणी वर्गाच्या संचालकांची राहणार आहे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.