पालघर : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवराय पुतळा प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली. राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याचे संस्कार माझ्यावर झालेले नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिनशर्त माफी मागितली. ते पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराचे भूमिपूजन इतर सरकारी कार्यक्रमांसाठी आले होते. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदींनी त्यांची भूमिका थेट जाहीर केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांसारखे आम्ही नाही, असे सांगत पंतप्रधान मोदींनी मविआला टोला लगावला.
काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर जे काही झाले ते दुर्दैवी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी फक्त एक नाव नाही. ते आमच्यासाठी पूजनीय असे दैवत आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होतो आणि त्यांची माफी मागतो; असे पंतप्रधान मोदी म्हणाले.