नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी झाली नाही. या अपयशाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मोकळे करण्याची आणि विधानसभा निवडणुकीकरिता पक्ष मजबूत करण्यासाठी काम करू द्यावे अशी विनंती केली. ते राजीनाम्यावर ठाम आहेत. पण पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ नेतृत्वाने फडणवीस यांचा राजीनामा घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. फडणवीस यांनी त्यांच्याकडे असलेल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत पक्ष मजबूत करण्याचे काम करावे, असे निर्देश नेतृत्वाने दिले आहेत. राष्ट्रीय नेतृत्वाने हे निर्देश दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील इतर सहकाऱ्यांशी पुढील योजनांवर चर्चा सुरू केली असल्याचे सूत्रांकडून समजते.