मुंबई : काही जण ठरवून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. शासनाला सहकार्य करणे टाळायचे, वेळोवेळी दुतोंडी राहून आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवून वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला ठरवून विरोधी पक्षांचे प्रमुख नेते गैरहजर राहिले. मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना आरक्षणाबाबत त्यांची भूमिका लेखी स्वरुपात राज्य शासनाला कळवण्याचे आवाहन केले आहे. पण विरोधकांनी बैठकीला अनुपस्थित राहून आणि शासनाशी संवाद टाळून ठरवून वेगळी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना काही जण ठरवून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्य शासन आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.