विरार : पालघर जिल्ह्यात तीन आमदार असलेल्या बविआचं निवडणूक चिन्ह शिट्टी आहे. पण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना हे चिन्ह मिळणं अवघड आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार, राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी शिट्टी चिन्ह जनता दल युनायटेडला दिलं आहे. त्यामुळे बविआला यंदा वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल.
अनेक वर्षांपासून वसई - विरारच्या राजकारणावर हितेंद्र ठाकूर यांचं वर्चस्व आहे. या वर्चस्वाला भाजपाकडून आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. हितेंद्र ठाकूर यांचे आत्येभाऊ, मोठे बांधकाम व्यावसायिक आणि वसई - विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. ते नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितीज ठाकूर तीनवेळा नालासोपाऱ्यातून आमदार झाले आहेत. पण राजीव पाटील निवडणूक रिंगणात उतरल्यास क्षितीज यांना आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.