चेन्नई : भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या कसोटीतला तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३७६ आणि दुसऱ्या डावात ४ बाद २८७ धावा केल्या. बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद १४९ आणि दुसऱ्या डावात ४ बाद १५८ धावा केल्या आहेत. जिंकण्यासाठी बांगलादेशपुढे ३५७ धावांचे आणि भारतापुढे सहा बळी घेण्याचे आव्हान आहे. अद्याप दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. यामुळे दोन्ही संघांकडे जिंकण्याची संधी आहे. कोणता संघ बाजी मारतो याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.
भारताकडून दुसऱ्या डावात शुभमन गिलने नाबाद ११९ आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने १०९ धावांची खेळी केली. केएल राहुलने नाबाद २२ धावा केल्या. तर बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हुसेन शांतोने ५१ धावांची खेळी केली. शादमान इस्लामने ३५ आणि झाकीर हसनने ३३ धावा केल्या. भारताकडून आर. अश्विनने बांगलादेशच्या तीन खेळाडूंना बाद केले तर बुमराहने एक बळी घेतला.