तिरुपती : जगातील सर्वात श्रीमंत देवस्थानांमध्ये तिरुपती बालाजी मंदिराचा समावेश होतो. हे तिरुपती बालाजी मंदिर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आंध्रमधील तिरुपती बालाजी मंदिरात लाडू प्रसाद देण्याची परंपरा आहे. मागील अनेक दशकांपासून लाडू प्रसाद दिला जात आहे. पण जगनमोहन रेड्डी यांचे सरकार असताना तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसाद तयार करताना प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता, असे वक्तव्य आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे.
जगन सरकारच्या काळात लाडू प्रसाद तयार करताना त्यात गोमांसाची चरबी, डुकराची चरबी आणि माशाचे तेल याचा वापर केला जात होता. पण तेलगू देसम पक्षाचे सरकार आल्यापासून हा प्रकार बंद करण्यात आला आहे. मंदिराचे पावित्र्य जपले जात आहे, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले.
लाडू प्रसाद तयार करण्यासाठी नंदीनी संस्थेमार्फत तुपाचा पुरवठा केला जातो. पण जगन सरकारच्या काळात खासगी कंपनीच्या माध्यमातून स्निग्धता निर्माण करणाऱ्या पदार्थाचा पुरवठा होत होता. ही कंपनी स्निग्धता निर्माण करणाऱ्या पदार्थाच्या निर्मितीसाठी गोमांस, डुकराची चरबी आणि माशाचे तेल याचा वापर करत होती. तेलगू देसम पक्षाचे सरकार आल्यापासून पुन्हा नंदीनी संस्थेमार्फत तुपाचा पुरवठा सुरू केला आहे. मंदिराचे पावित्र्य जपले जात आहे, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.