Saturday, September 28, 2024 03:49:53 PM

Akshay Shinde
अक्षय प्रकरणी उच्च न्यायालयात ३ ऑक्टोबरला सुनावणी

अक्षय शिंदे चकमक प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीअंती उच्च न्यायालयाने ३ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अक्षय प्रकरणी उच्च न्यायालयात ३ ऑक्टोबरला सुनावणी

मुंबई : अक्षय शिंदे चकमक प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीअंती उच्च न्यायालयाने ३ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून तपासाकरिता एका ठिकाणी घेऊन जात होते. ही कारवाई सुरू असताना पोलीस गाडीत गोळीबार झाला. अक्षयने एका पोलिसाचे रिव्हॉल्व्हर खेचून घेतले आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली. जखमी झालेल्या अक्षयला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर अक्षयचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. शवविच्छेदनाअंती मुंबईच्या जेजे रुग्णालयाने जास्त रक्तस्राव झाल्यामुळे अक्षयचा मृत्यू झाला, असे सांगितले. ही माहिती मिळाल्यानंतर उच्च न्यायालयाने पोलिसाचे रिव्हॉल्व्हर अनलॉक कसे असू शकते ? असा प्रश्न उपस्थित केला. 

पोलिसाने त्याच्याकडे असलेले रिव्हॉल्व्हर कायम लॉक करुन ठेवायचे असते. आवश्यकता भासेल त्यावेळी हे रिव्हॉल्व्हर अनलॉक करुन वापरायचे असते. रिव्हॉल्व्हर वापरताना आधी इशारा द्यावा आणि इशारा देणे शक्य नसेल अथवा इशारा देऊनही कायदा सुव्यवस्था संकटात येत असेल तरच रिव्हॉल्व्हर वापरावे. आधी हवेत गोळीबार करावा, गरज भासल्यास पायावर किंवा हातावर गोळी झाडून जखमी करावे असे पोलिसांसाठीचे नियम सांगतात. या नियमांचे पालन का झाले नाही ? जी एक गोळी पोलिसाने झाडली ती डोक्यातच कशी लागली ? असा प्रश्न सुनावणीवेळी उच्च न्यायालयाकडून उपस्थित करण्यात आला. या प्रकरणात ३ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी आहे. 

'राजकीय लाभासाठी अक्षयला बनावट चकमकीत ठार केले'

राजकीय लाभासाठी अक्षय शिंदेला बनावट चकमकीत ठार केले असा आरोप अॅडव्होकेट अमित कटारनवरे यांनी केला. ते अक्षय शिंदेंच्या कुटुंबाच्यावतीने उच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहेत. अक्षयचा मृतदेह ताब्यात घेऊन पुरणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. पुरावे नष्ट होऊ नये यासाठी ही खबरदारी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अक्षयच्या मृत्यूची सीआयडी चौकशी

अक्षय शिंदे चकमकीत ठार झाला. या प्रकरणी पोलिसांची गुन्हे अन्वेषण शाखा अर्थात सीआयडी तपास करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशीचे निर्देश दिले आहेत. सीआयडीच्या पथकाने मुंब्रा पोलीस ठाण्यातून अक्षय प्रकरणाशी संबंधित तपासाची कागदपत्रे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सीआयडी अक्षयच्या कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवणार आहेत. 


सम्बन्धित सामग्री