Tuesday, June 10, 2025 02:27:50 AM

विमा सखी योजनेंतर्गत 2 लाख महिलांना मिळणार रोजगार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमा सखी योजनेचा शुभारंभ केला आहे.

विमा सखी योजनेंतर्गत 2 लाख महिलांना मिळणार रोजगार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमा सखी योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेंतर्गत येत्या तीन वर्षात दोन लाख महिला विमा एजंट नेमण्यात येणार आहेत. यामध्ये 18 ते 70 वर्षे वयोगटातील दहावी उत्तीर्ण असलेल्या महिलांना सक्षम विमा एजंट म्हणून संधी दिली जाणार आहे.

आर्थिक साक्षरता आणि विमा जागरुकता वाढवण्यासाठी या विमा सखींना पहिल्या तीन वर्षात विशेष प्रशिक्षण आणि विद्यावेतन मिळेल.  प्रशिक्षणानंतर त्या  एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतील तसेच पदवीधर विमा सखींना भारतीय आयुर्विमा महामंडळात विकास अधिकारी पदासाठी पात्र ठरण्याची संधी मिळेल.

भारतातील महिलांचा यापूर्वी विमा काढला जात नव्हत. आज लाखो महिलांना विमा एजंट किंवा विमा सखी बनविण्याची मोहीम सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, आता महिला विम्यासारख्या क्षेत्राच्या विस्ताराचे नेतृत्व करतील.विमा सखी योजनेअंतर्गत 2 लाख महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण  पूर्ण केलेल्या मुलींना विमा सखी योजनेंतर्गत प्रशिक्षण देऊन तीन वर्षांसाठी आर्थिक मदत केली जाईल, असेही ते म्हणाले. एक एलआयसी  एजंट दरमहा सरासरी 15 हजार रुपये कमावतो. विमा सखी दरवर्षी 1.75 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतील आणि त्यामुळे  कुटुंबाला अतिरिक्त उत्पन्न मिळेल असे पंतप्रधान  मोदी म्हटले आहे.

विमा सखींचे योगदान पैसे कमावण्याव्यतिरिक्त बरेच काही असणार आहे. देशामध्‍ये सर्वांसाठी विमाहे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सामाजिक सुरक्षेसाठी आणि गरिबी मुळापासून नष्ट करण्यासाठी हे आवश्यक आहे. त्‍यामुळेच या  विमा सखी सर्वांसाठी विमाअभियानाला बळ देतील यावरही त्यांनी भर दिला. ज्यावेळी  एखाद्या व्यक्तीचा विमा उतरवला जातो त्यावेळी  मिळणारे फायदे  खूप मोठे असतात. सरकार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबवत आहे. या योजनांतर्गत अत्यंत कमी विमा हप्‍त्‍यावर 2 लाख रुपयांचा विमा प्रदान करण्यात आला आहे. देशातील 20 कोटींहून अधिक लोक जे  विम्याविषयी  विचारही करीत  नाहीत. त्यांचा विमा उतरवण्यात आला आहे. या दोन योजनांतर्गत आतापर्यंत सुमारे 20 हजार कोटी रुपयांच्या दाव्याची रक्कम देण्यात आली आहे. देशातील अनेक कुटुंबांना सामाजिक सुरक्षा कवच देण्यासाठी विमा सखी कार्यरत आहेत. हे एक प्रकारचे पुण्यकर्म  आहे, अशी टिप्पणी पंतप्रधान  मोदी यांनी केली.


सम्बन्धित सामग्री