नवी दिल्ली, १ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तामिळनाडूतील सर्व ३९ जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे आणि मतमोजणी ४ जून रोजी होईल. मतदानाचा दिवस जवळ येऊ लागताच तामिळनाडूत कच्चातिवु बेटाचा मुद्दा तापण्यास सुरुवात झाली आहे.
भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या सरकारमध्ये १९७४ मध्ये एक करार झाला. या करारानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने सागरी सीमा आखली आणि सागरी सीमा आखताना कच्चातिवु बेट श्रीलंकेच्या सीमेच्या आत दाखवले. हे कोणी केले ते आम्हाला माहिती आहे, कोणी लपवले ते आम्हाला माहिती नाही; असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले.
कच्चातिवु बेट श्रीलंकेचे होते असा पुरावा नाही पण भारतीय मच्छीमार मागील अनेक दशकांपासून कच्चातिवु बेटाजवळच्या सागरी भागात जात आहेत. ज्यावेळी कायदेशीर सल्ला घेण्यात आला त्यावेळी सल्लागारांनी कच्चातिवु बेटाजवळच्या सागरी भागात मासेमारीचा हक्क भारताकडे राखावा असे मत व्यक्त केले. पण सल्लागारांच्या मताकडे त्यावेळच्या केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारने दुर्लक्ष केले. यामुळे भारत कच्चातिवु बेटाविषयी श्रीलंकेशी चर्चा करत आहे, असेही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.