बंगळुरू, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूत पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे शहर अशी ओळख मिरवणाऱ्या बंगळुरूमधील पाण्याचे संकट वाढू लागले आहे. बंगळुरूतील भूजल पातळी अर्थात जमिनीखालील पाण्याची पातळी कमी झाली आहे. शहरीकरण वेगाने सुरू असताना पाण्याच्या टंचाईमुळे बंगळुरूतील नागरिक त्रस्त झाले आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार १४ हजार ७८१ कूपनलिकांपैकी ६९९७ कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत तर ७७८४ कूपनलिका सुरू आहेत. बंगळुरूला दररोज १८५० दशलक्ष लिटर पाणी मिळत आहे. पण बंगळुरूला दररोज आणखी १६८० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे बंगळुरूच्या नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला आहे.