नवी दिल्ली, १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत गुरुवार १ फेब्रुवारी रोजी लेखानुदान २०२४ सादर केले. याप्रसंगी बोलताना, रेल्वेच्या ४० हजार डब्यांचे रुपांतर वंदे भारत डब्यांमध्ये करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. नमो भारत आणि मेट्रोमुळे शहरांतील अंतर कमी झाले आहे. या दोन्ही रेल्वे सेवांचा विस्तार केला जाईल. प्रवासी गाड्यांच्या संचालनात सुधारणा होईल, तसेच प्रवाशांची सुरक्षा वाढून प्रवासाचा वेगही अधिक होईल. मेट्रोचे जाळे वाढवण्यावर सरकारचा भर राहील, असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले. विजेच्या बस आणि चार्जिंग स्टेशनची संख्या वाढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशात नवीन १४९ विमानतळ उभारणार असून ५१७ नवे विमानमार्ग प्रस्तावित आहेत. विमान वाहतूक क्षेत्राचा मागील १० वर्षांत कायापालट करण्यात आला असून येत्या काही वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.
लेखानुदान लोकसभेत सादर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत गुरुवार १ फेब्रुवारी रोजी लेखानुदान २०२४ सादर केले. लोकसभेची निवडणूक असल्यामुळे यंदा १ फेब्रुवारी रोजी पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी लेखानुदान सादर करण्यात आले. निवडणुकीनंतर नवे सरकार उर्वरित आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करेल.
महत्त्वाचे मुद्दे
करदात्यांनी दिलेल्या रकमेचा देशाच्या विकासासाठी विचारपूर्वक वापर
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ४७.६६ लाख कोटी रुपये खर्चाचा अंदाज
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २६.०२ लाख कोटी रुपये कर महसूल मिळण्याचा अंदाज
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ५.१ टक्के राजकोषीय तुटीचा अर्थात फिस्कल डेफिसिटचा अंदाज
आयकर विवरण पत्र भरणाऱ्यांमध्ये दहा वर्षात २.४ टक्के वाढ