नेपाळ शुक्रवारी मध्यरात्री भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठ नुकसान झालं आहे. अनेक घर कोसळली असून पश्चिम नेपाळमध्ये हा भूकंप झाला. यात नालगड़ म्यूनसिपालटीच्या उपमहापौरांसह १२९ नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. जाजरकोट आणि पश्चिम रुकुमध्ये सर्वाधिक नुकसान झालेलं आहे. रात्री उशिरा तीव्र भूकंपाचे धक्के उत्तर प्रदेश, दिल्ली, पटना, झारखंड आणि बिहारपर्यंत जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक लगेच आपल्या घराबाहेर पळाले आणि एकच गोंधळ उडाला.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील भूकंपाच्या या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. “या भूकंपात जे नुकसान झालं, ज्यांनी प्राण गमावले, त्या बद्दल पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला. भारत भक्कमपणे एकजुटीने नेपाळी जनतेच्या पाठिशी उभा आहे. आम्ही शक्य ती सर्व मदत करु. ज्या कुटुंबानी या भूकंपात आप्तस्वकियांना गमावलं, त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जे जखमी आहेत, त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.