नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : केंद्र सरकारने इस्रायलमधून मायदेशी परतू इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी ऑपरेशन अजय सुरू केले आहे. या मोहिमेचा भाग म्हणून गुरुवारी पहिले विमान तेल अविव येथे पोहोचेल. या विमानाने शुक्रवार सकाळ पर्यंत २३० भारतीय मायदेशी परततील. ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली.
दहशतवादी हल्ल्यात इस्रायलमध्ये एकाही भारतीयाचा मृत्यू झाल्याची माहिती अद्याप आलेली नाही. इस्रायलमध्ये सुमारे अठरा हजार भारतीय आहेत. यापैकी जे मायदेशी परतू इच्छितात त्यांना आणण्यासाठी भारत सरकारने मोहीम सुरू केली आहे. मायदेशी परतू इच्छिणाऱ्या भारतीयांची नोंदणी इस्रायलमध्ये सुरू आहे. ही नोंदणी इस्रायलमधील दूतावासाच्या माध्यमातून सुरू आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.