नवी दिल्ली, २६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात रालोआमधून अण्णाद्रमुक पक्ष बाहेर पडला. यामुळे तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला फटका बसणार की नाही यावरून चर्चेला उधाण आले आहे.
अण्णाद्रमुकचे तामिळनाडूच्या विधानसभेत ६२ आमदार आहेत. लोकसभेत अण्णाद्रमुकचा एकही खासदार नाही. सध्या तामिळनाडूत १३३ आमदार असलेल्या द्रमुकची सत्ता आहे. अण्णाद्रमुक हा तामिळनाडूतील मुख्य विरोधी पक्ष आहे. भाजपाचे तामिळनाडूच्या विधानसभेत चार आमदार आहेत.
प्रदीर्घ चर्चेअंती झाला निर्णय
के. अण्णामलाई यांच्या नेतृत्वात मागील काही महिन्यांपासून भाजपाने तामिळनाडूत विस्ताराचे प्रयत्न सुरू केले आहे. भाजपाचे नेते उघडपणे सनातन धर्माचे समर्थन करणारी वक्तव्ये करत आहेत. के. अण्णामलाई यांच्या 'रोड शो'ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. भाजपाचा हा नवा पवित्रा राजकीयदृष्ट्या गैरसोयीचा वाटल्यामुळे अण्णाद्रमुकने रालोआमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदीर्घ चर्चेअंती वरिष्ठ नेतृत्वाने हा निर्णय घेतला, अशी माहिती अण्णाद्रमुकच्यावतीने देण्यात आली. अण्णाद्रमुकने रालोआतून बाहेर पडत असल्याची घोषणा केल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.