मिझोरम : मिझोरममधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळून १७ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. अजूनही काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मिझोरमची राजधानी आयजोल पासून २१ किमी अंतरावर असलेल्या सायरंगमध्ये बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. पूल कोसळल्याची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केले आहे. घटनेच्या वेळी पुलावर ३५ ते ४० मजूर काम करत होते. बैराबी ते सायरंग जोडणाऱ्या कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. तिसऱ्या आणि चौथ्या खांबामधील गर्डर ३४१ फूट पडला. पुलामध्ये एकूण ४ खांब आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या खांबामधला गर्डर खाली पडल्याने हा अपघात झाला. या गर्डर खाली हे सर्व मजूर काम करत होते. जमिनीपासून पुलाची उंची १०४ मीटर म्हणजेच ३४१ फूट आहे. म्हणजेच पुलाची उंची कुतुबमिनारपेक्षा जास्त आहे.