सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरजमधील वकील झाकीर जमादार आणि त्यांचा भाऊ नासीर जमादार यांच्या त्रासाला कंटाळून भूपाल माळी यांनी २०१६ मध्ये आत्महत्या केली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र घटना घडून सात वर्ष झाली तरी आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी आमची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील ॲड.विरेंद्र सराफ यांची नियुक्ती करावी अशी मागणी शोभा माळी यांनी शासनाकडे केली आहे.
माळी म्हणाल्या, मिरजेतील वैरण बाजार परिसरातील घरकुलाच्या वादातून जमादार बंधूंनी आमच्या कुटुंबाला घराबाहेर काढले. त्यानंतर माझे पती भूपाल माळी यांनी याबाबत पोलिसांसह प्रशासनाकडे तक्रारीही दिल्या. मात्र आमच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. त्यानंतरही जमादार यांच्या त्रासाला कंटाळून भूपाल माळी यांनी २३ जून २०१६ रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांची नावे लिहून एक चिठ्ठी ठेवली होती.
या घटनेनंतर मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात झाकीर हुसेन, मोहीद्दीन जमादार, नासीर मोहीद्दीन जमादार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होऊनही या दोघांना अटक करण्यात आलेली नाही असा आरोपही शोभा माळी यांनी केला. याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आमच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आणि माझ्या पतीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी आमच्या बाजूने वरीष्ठ सरकारी वकील विरेंद्र सराफ यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणीही शोभा माळी यांनी केली आहे.